पुणे ( पुणे 24 तास )
— हवामानातील बदल आणि तापमानात होणारी वाढ ही डेंग्यू पसरवणाऱ्या डासांसाठी पोषक ठरत आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, कमी वेळेत अधिक पाऊस पडणे आणि जून ते सप्टेंबर या दरम्यान ६० टक्के आर्द्रता असणे या परिस्थितीत डेंग्यू डोके वर काढतो, असे आमचे निरीक्षण आहे. यानुसार डेंग्यूविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली आम्ही विकसित केली आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केले.
भवताल फाऊंडेशन, आयसर-पुणे, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संशोधन प्रोग्रॅम (WCRP) यांच्या संयुक्त विद्यमाने आयसर (पुणे) येथे १८ व १९ जानेवारी रोजी ‘हवामान बदल जाणून घेताना’ (Understanding climate change) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणे, मुंबई, ठाणे, नंदूरबार, पालघर, चिपळूण, सातारा, बारामती अशा वेगवेगळ्या भागांतून आलेले नागरिक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत आयसर-पुणे येथील डॉ. जॉय मॉन्टेरो, प्रा. छावी माथूर, प्रा. बीजॉय थॉमस, ‘आयआयटीएम’मधील संशोधक आदिती मोदी, राज्य सरकारच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख, पर्यावरण अभ्यासक आणि ‘भवताल फाउंडेशन’चे संस्थापक अभिजित घोरपडे, दै. अॅग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव, ‘भवताल फाऊंडेशन’चे समन्वयक वैभव जगताप यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. कोल म्हणाले की, वाढते तापमान आणि चढ-उताराच्या मान्सूनमुळे डेंग्यू वाढत आहे. डेंग्यू-संबंधित मृत्यू भविष्यात वाढू शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मान्सूनच्या पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित आहे. अतिवृष्टीमुळे डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतात; परंतु विकसित केलेले मॉडेल दर्शविते की, उष्ण दिवसांमध्ये होणारी डासांची वाढ डेंग्यूच्या भविष्यातील बदलांवर प्रभाव टाकते. कार्बन उत्सर्जनांतर्गत पुण्यात सरासरी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच भारतातील तापमान आणि आर्द्रता भविष्यात आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उदय देशमुख म्हणाले की, कृषी ही एक मूल्यसाखळी आहे. साधारणपणे ३० वर्षांपूर्वी आम्ही धुळपेरणीनंतर पिकाच्या उत्पादनात वाढ होते, असे छातीठोकपणे सांगत होतो. आता किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करावे लागते. हवामान बदलाचे हे दृश्य परिणाम आहेत. सध्या महाराष्ट्रात २७०० हवामान केंद्रे आहेत. दर दहा किलोमीटरमधील पावसाचे अपडेट मिळतात. तरीही मोजणीमध्ये भिन्नता आढळते, हे सत्य नाकारून चालणार नाही. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी शासन पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि एकंदरीत सरकारी योजनांबाबत देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रा. जॉय मोंटेरो यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता आणि बेसूमार वापर याबद्दल चिंता व्यक्त केली. जास्त उत्सर्जनाच्या परिस्थितीत सिंचनाची आवश्यकता कमी होत आहे. कदाचित कमी उत्पादनामुळे हा धोका संभवतो. कमी उत्सर्जनाच्या परिस्थितीत तांदळाचे उत्पादन वाढते; परंतु जास्त उत्सर्जनाच्या वेळी घटते. बाजरीच्या उत्पादनात कमालीची घट होत असल्याचे नमूद करत, सामुदायिक कृती आराखड्याचा विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रा. बीजॉय थॉमस यांनी औद्योगिक क्रांतीनंतर जगाचे वाढलेले सरासरी तापमान आणि त्याचा मानवी शरीर आणि वनस्पती, पिकांवर होणारा परिणाम या विषयावर भाष्य केले. हवा, जमीन आणि समुद्राच्या पाण्याचेही तापमान वाढत असल्याने नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. पाऊस सरासरी एवढा पडत असला तरी कमीत कमी वेळात अतिवृष्टी, ढगफुटी होत आहे. महापूर येत आहेत. उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.
कमी पाऊसमानामुळे अनेक ठिकाणांचं वाळवंटीकरण होत आहे. अशा आपत्तींना कसे सामोरे जायचे याची रुपरेषा स्पष्ट करत संस्थात्मक पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. प्रा. छावी माथूर यांनी जलव्यवस्थापनाच्या सुयोग्य पद्धती सांगितल्या.
आदिती मोदी यांनी महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या आव्हांनाबाबत चर्चा केली. जैवविविधतेचे नुकसान, जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम, दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढणे, ओझोनचा स्तर कमी होणे, उष्णतेच्या लाटा, समुद्राच्या पातळीत वाढ व त्यामुळे किनारपट्टीवरील जनतेला असला धोका, जमिनीचे वाळवंटीकरण या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचे आव्हान याबाबत सजग रहाण्याचे आवाहन केले.
हवामान बदलामुळे भारतीय शेतीपुढे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी शेती पद्धतीत पुरक बदल करण्याबरोबरच निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली अंगिकारण्याची गरज आहे. ‘क्लायमेट फ्रेंडली’ शेती भविष्यात रोजी-रोटीचा प्रश्न सोडवू शकते. आजवर हरितक्रांती झाली, धवल क्रांती झाली, आता ‘हवामान क्रांती’ची (क्लायमेट रिव्होल्युशन) गरज आहे, असे प्रतिपादन रमेश जाधव यांनी केले.
वैभव जगताप यांनी, ‘भवताल फाऊंडेशन’च्या ‘भिजूया-मोजूया’ या उपक्रमाची माहिती देत, या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्रिलोक खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोट
हवामान बदल हे वास्तवच, मात्र…
“हवामान बदल हे वास्तव आहे, त्याबाबत शंकाच नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट हवामान बदलाच्या माथी मारणे योग्य नाही. किंबहुना, या बदलांच्या काळात आपला निसर्ग-परिसंस्था यांचे संवर्धन करणे, नैसर्गिक प्रवाह सुस्थितीत ठेवणे आणि नागरी सुविधांची अधिक चांगली काळजी घ्यायला हवी, असे केले तरच आपण या संकटाला सामोरे जाण्यास सक्षम होऊ.”

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























