*
पुणे 🙁 पुणे 24 तास ब्युरो )
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यातील मूळ संकल्पना म्हणजे ही सोलर सिस्टीम बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर जेवढे युनिट वीज सूर्यप्रकाशामुळे तयार होईल ती त्यांनी महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकायची आणि ग्राहक दिवसरात्र मिळून जेवढे युनिट वीज वापरेल ती तयार केलेल्या युनिटमधून वजा करुन फक्त उर्वरीत युनिट चे पैसे भरायचे. जर तयार केलेली वीज वापरलेल्या वीजेपेक्षा जास्त असेल तर तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतील व ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या युनिटसचा वापर तो करु शकेल व वर्षाअखेर जे युनिट्स त्यांच्या खात्यात जास्तीचे शिल्लक राहतील त्यांचे महावितरण ग्राहकाला पैसे देईल. ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी *नेट मीटर* बसवण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना हे मीटर्स स्मार्ट मिटर नव्हते. मात्र आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवणार आहे जे TOD meters असणार आहेत. रुफटाॅप रेग्युलेशन्स २०१९ च्या 11.4 ( d) प्रमाणे TOD net meters असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या ज्या काळात ( म्हणजे सकाळी ९ ते संध्याकाळी ५) सोलर सिस्टीम मधून वीज तयार केली गेली असेल त्याच काळात वापरलेल्या युनिट्स बरोबर वजाबाकी होईल आणि या काळात जी जास्तीची वीज तयार होईल ती off peak काळात तयार झालेली वीज म्हणून धरली जाईल. व अर्थातच peak hours मध्ये त्याचा setoff मिळणार नाही. मुळातच सोलर मधून वीज फक्त दिवसा ९ ते ५ या वेळेतच तयार होते तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो, त्यामुळे त्याला आता या TOD meters मुळे set off मिळणार नाही. आत्ता महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात off peak hours म्हणून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सोलर वीज त्याच काळात वापरली नाही तर ती फक्त खात्यात दिसत राहील व वर्षाचे शेवटी तेवढ्या युनिट्स च्या ८८% युनिट्स चे ३ / ३.५० रुपयांप्रमाणे पैसे मिळतील आणि ग्राहक संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे त्याला बिल भरावेच लागेल आणि सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावेल. यातून ग्राहकांचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होईल .
याला उपाय काय तर ग्राहकांनी महावितरणच्या वीजदरवाढ प्रस्तावावर १७ फेब्रुवारी पर्यंत खालील म्हणणे नोंदवणे आवश्यक आहे.
*प्रत्येक घरगुती ग्राहकाला स्मार्ट मिटर / स्मार्ट नेट मिटर लावला तरी TOD meter प्रमाणे बिल हवे आहे की नको आहे हे ठरवायची संधी( स्वतंत्र अर्ज भरुन) मिळाली पाहिजे*
सदरहू म्हणणे www.merc.gov.in/e-public-consultation या संकेतस्थळावर महावितरण प्रस्ताव क्रमांक २१७/२०२४ येथे जाऊन नोंदवणे गरजेचे आहे.
—– विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,पुणे

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























