पुणे २४ तास ः- पुणे महापालिका निवडणुकीनंतर निकालांइतकीच मतदानाच्या आकडेवारीची विश्वासार्हताही प्रश्नांकित ठरत आहे. ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे यांनी मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडे यांत मोठा फरक असल्याचा आरोप करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मतदानाच्या दिवशी रात्री १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी करमरकर यांनी एकूण ७९,८२६ मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्षात केवळ ७८,७१८ मते मोजण्यात आली. म्हणजेच १,१०८ मते नेमकी कुठे गेली, असा थेट प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.
हा फरक अधिक संशयास्पद ठरतो, कारण याच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३६ आणि ३७ मध्ये मात्र आधी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा मतमोजणीवेळी मतदान वाढलेले दिसून आले. मग फक्त प्रभाग ३८ मध्येच मतदान कमी कसे झाले, असा सवाल मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच प्रभागात त्यांना अवघ्या १,०११ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
वसंत मोरे यांनी अधिकृत आकडेवारीची प्रत सोशल मीडियावर प्रसिद्ध करत ही बाब सार्वजनिक केली आहे. “जनतेचा कौल आम्ही मान्य करतो; मात्र आकड्यांतील अशा तफावतीमुळे काही ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनीच निकाल ठरविल्याची भावना निर्माण होत आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली आहे.
या आरोपांमुळे पुण्यातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























