पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत आणि मायेच्या ऊबेत मात्र कोणताही बदल झालेला नाही. आजही तेच प्रेम, तीच चिंता, तीच आपुलकी… जणू काळ त्यांच्या भावनांना स्पर्शही करू शकलेला नाही.
खरंच, कधी शांतपणे विचार केला आहे का—एक आई-वडील दहा मुलांचा सांभाळ करू शकतात; पण दहा मुले मिळूनही एक आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत. ही आजच्या काळाची कटू, पण खरी परिस्थिती आहे. आपण आजारी पडलो तर मित्र, नातेवाईक भेटायला येतात, दोन शब्द बोलतात आणि परत जातात. पण रात्रंदिवस दवाखान्यात आपल्या शेजारी बसून डोळ्यांत झोप न आणणारी आई, आणि उपचारासाठी लागणारे पैसे कसे जमवायचे या चिंतेत धडपडणारा बाबा—हे दृश्य कुणालाच दिसत नाही.
लहानपणापासून आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा, सुख, स्वप्नं बाजूला ठेवणारे हे दोन जीव. आपण काही अस्पष्ट बोललो, कुणालाच न समजणारे शब्द, तेव्हा फक्त आई-वडिलांनाच कळतं—आपण काय म्हणतोय, काय हवंय. आज मात्र परिस्थिती उलट झाली आहे. आई-बाबा फक्त एवढंच मागतात—थोडा वेळ, दोन प्रेमाचे शब्द, थोडी आपुलकी. पण आपणच अनेकदा त्यांच्याशी अशा शब्दांत बोलतो, जणू ते आपले शत्रूच आहेत.
आज आपण शिकलेलो आहोत, आधुनिक आहोत, पुढारलेलो आहोत असं समजतो; पण त्या शिकण्यामागचा पाया कोणाचा होता, हे विसरतो. कॉलेजच्या दिवसांत आईने शेजाऱ्याकडून बसच्या पासासाठीआणलेले पैसे, बाबांच्या अंगावर फाटलेले कपडे, पण मुलासाठी कर्ज काढून आणलेले नवे कपडे—ही त्यागाची जाणीव काळाच्या ओघात बोथट होत चालली आहे.
जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते, संपूर्ण समाज आपल्या विरोधात उभा राहतो; तेव्हा मात्र आई-वडील आपल्यासोबत उभे राहतात. कारण त्यांचा विश्वास अढळ असतो—माझं मूल वाईट असूच शकत नाही. चूक झाली, तरी ती सुधारण्यासाठी धावणारे पहिले पाय आई-वडिलांचेच असतात.
आज घराला घरपण आहे, आपुलकी आहे, माणुसकी आहे—ती फक्त आणि फक्त आई-वडिलांमुळेच. एखादी मुलगी सासरहून माहेरी जाते, तिचा मान-सन्मान, तिची ओळख ही फक्त आई-वडिलांमुळेच असते. आईकडे काही नसतं, तरीही मुलगी सासरी जाताना पिशवी भरून देणारी ही जुनी माणसं… ही जुनी माया आहे.
आई म्हणजे निःस्वार्थ प्रेमाची मूर्ती—जिच्या मायेची उब आयुष्यभर पुरते.
बाबा म्हणजे न बोलता झिजणारा आधार—जो आयुष्यभर आपल्यासाठी उभा असतो.
देवाकडे ते कधी मोठ्या अपेक्षा करत नाहीत. फक्त एवढंच मागतात—माझी मुलं सुखी राहो, सुरक्षित राहो.
म्हणूनच माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे—
परमेश्वरा, तुला जे हवं ते माझ्याकडून घे; पण माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावर राहू दे.
कारण या जगात सगळं परत मिळू शकतं,
पण आई-वडील परत कधीच मिळत नाहीत. “आई-वडील म्हणजे न बोलता झिजणारी देवमाणसं,
आपल्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य विसरणारी माणसं.
जग सगळं सोबत सोडून गेलं, तरी जे कायम उभे राहतात,
ते फक्त आई-वडीलच असतात—आशीर्वादाच्या रूपात.”
लेखक: मुबारक शहाबुद्दीन तांबोळी,
लायब्रेरियन,पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड एन्ट्रेप्रेन्योरशिप, पुणे 📞 मोबाईल: 91 58 55 89 30📧 ई-मेल: mubaraktamboli931@gmail.com.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























