पुणे २४तास ः- विधानसभा फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कायमचा दुभंग झाल्याचे मानले जाणारे शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी गट आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. चंदगड नगर परिषद निवडणुकीतून आकाराला आलेले हे समीकरण आता गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांपर्यंत विस्तारत असून, या भागात थेट भाजपविरोधी लढतीचे संकेत मिळत आहेत.
नगरपालिका निवडणुकांत महायुती एकत्र लढली असली, तरी जागावाटपातील मतभेदांमुळे बहुतांश ठिकाणी घटक पक्ष स्वतंत्र उतरले होते. मात्र चंदगडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वेगळे राजकीय चित्र निर्माण झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या समन्वयाने ताकद दाखवली गेली, तरी भाजप समर्थित आमदार शिवाजीराव पाटील यांनी पालिकेवरील वर्चस्व कायम राखले.
मात्र महिनाभरातच हेच राष्ट्रवादी समीकरण अधिक व्यापक रूप घेत असून, भाजपला रामराम ठोकत संग्रामसिंह कुपेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही आघाडी बळकट झाल्याचे मानले जाते. याचवेळी भाजपकडूनही हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील आणि मानसिंग खराटे यांच्या गटाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शिंदेसेना, ठाकरेसेना आणि काँग्रेस यांची तिसरी आघाडी मैदानात असल्याने कोल्हापूरच्या दक्षिण भागात द्विपक्षीय नव्हे, तर तिरंगी आणि अधिक चुरशीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्थानिक राजकारणासाठी एकत्र येत असतील, तर ही केवळ तात्पुरती निवडणूक युती आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय पुनर्रचनेची नांदी— हा प्रश्न विचारवंतांनाही संभ्रमात टाकणारा ठरत आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























