डॉ. अशोक बालगुडे, ज्येष्ठ पत्रकार
पुणे 24 तास :-
देशात पाणीटंचाई आहे, हे अर्धसत्य आहे. खरे संकट पावसाचे नसून, धरणांच्या पोटात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाचे आहे. पाणी साठवण्याची क्षमता आपणच गमावली आहे. तरीही आपण नव्या धरणांची स्वप्ने पाहतो, जुन्या धरणांकडे पाठ फिरवतो.
कर्नल सुरेश पाटील यांनी निवृत्तीनंतर जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये खडकवासला धरणाचे पुनर्जीवन करण्याचे ठरविले.
खडकवासला धरणात गेल्या २५ वर्षांत जे घडले, ते धोरणकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे. निवृत्त कर्नल पाटील यांनी लोकसहभागातून, पर्यावरणाशी संगत (अंदाजे ३५ लाख वृक्षरोपण) करून धरणातील गाळ काढण्याचा मार्ग दाखवला व घरणातील पाणीसाठवण क्षमता ३० टक्क्यांनी वाढविली. आणि पुणे शहरासह २५–३० गावांना स्थिर पाणीपुरवठा व धरणातील काढलेली सुपिक माती (गाळ) मोफत देऊ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीउत्पन्न दुप्पटीने वाढले. रासायनिक खते व युरिया वापरण्याची गरज पडली नाही. धरणातील गाळाला शेतकरी काळं सोनं म्हणतात. रासायनिक खतांमुळे नापीक झालेलल्या जमिनी धरणातील गाळामुळे पुन्हा जिवंत झाल्या. हा अनुभव खडकवासल्याच्या काठावर असलेल्या २८ गावांमध्ये दिसतो. शासन दरवर्षी हजारो कोटी रुपये युरिया व रासायनिक खतांवर खर्च करते. महाराष्ट्रातील ५०० धरणे गाळमुक्त केली, तर २५० नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि त्यातून ७०–८० हजार कोटी रुपयांची खत सबसिडी वाचू शकते, असे कर्नल पाटील ठामपणे सांगतात. सबसिडीमधून वाचलेला निधी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरता येऊ शकेल.
CSR:उद्योगांनी करून दाखविले
खडकवासला प्रकल्पाला आर्थिक बळ मिळाले ते CSRच्या माध्यमातून. हिंदुजा फाउंडेशन, कमिन्स इंडिया फाउंडेशन, फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन, टाटा मोटर्स यांसारख्या संस्थांनी निधी, यंत्रणा देऊ केली. खडकवासला धरण प्रकल्प देशासाठी एक रोल मॉडेल म्हणून गाजत आहे. या प्रकल्पाचे कौतुक जगभर होताना दिसत आहे.
शेतकऱ्यांना आपण रात्री-अपरात्री एक ते दीड तास वीज देतो. वास्तविक शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा केला पाहिजे. पण तसे का होत नाही, याचा विचार केला, तर धरणातून वीज निर्मिती कमी प्रमाणात होते. कारण धरणात वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी व गाळ जास्त असल्यामुळे अत्यल्प वीज निर्मिती होते. त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देता येत नाही. पण धरणात पाणी का नाही, याचे उत्तर कोणी देत नाही. पाण्याऐवजी गाळ आहे. गाळ काढला, तर पाणी वाढते. एक ट्रक गाळ बाहेर काढला, तर एक टँकर पाणी साठवण क्षमता वाढते. हे गणित राजकारणापेक्षा विज्ञानाचे आहे.
राज्यकर्त्यांसाठी अस्वस्थ करणारा प्रश्न
निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधून हा मुद्दा स्पष्टपणे मांडला. पुणे जिल्ह्यातील २५ धरणे येऊ घातलेल्या उन्हाळ्यामध्ये लोकसहभागातून शेतकऱ्यांच्या पुढाकाराने स्वच्छ केली तर, पुणे जिल्ह्यात १२ नवीन धरणे बांधल्याचा फायदा होईल. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा ऑर्गेनिक फार्मिगवर जाईल व पुणे जिल्ह्याचे शेतीउत्पन्न दुप्पट व तिप्पटीने वाढेल. त्याचा आर्थिक लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल, असे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी निक्षून सांगितले.
“रासायनिक खतांमुळे नापीक झालेली माझी जमीन धरणातील गाळामुळे पुन्हा सुपीक होत आहे.”
— अंकुश जावळकर, शेतकरी, खानापूर

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























