समाज बांधवांना संगमवाडी पुणे येथे लहुजी समाधी स्थळी उपस्थित राहण्यासाठी अशोक लोखंडे यांनी केले नम्र आवाहन…
पुणे 24 तास:- शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर रोजी, संगमवाडी येथे आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या 231व्या जयंती निमित्त महागायक चंदन कांबळे यांच्या गायनाचा कार्यक्रम दुपारी 2 वाजता तर मुख्य सभा सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रातून सर्व लहुजी अनुयायींना क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने लहुजींच्या समाधी स्थळी उपस्थित राहून अभिवादन करण्यासाठी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे महा.शासन अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी नम्र आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी विशेषतः मातंग समाजासाठी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधीस्थळ लाखोंच्या संख्येने एकत्र येण्यासाठी एकमेव असे स्फुर्तीस्थळ आहे.
त्यामुळे मागील 20 वर्षापासून स्मारक समिती व अनुयायींच्या झंझावाती प्रचारामुळे सध्या लहुजी जयंती व पुण्यतिथी दिनी महाराष्ट्रातून हजारो लहुजी अनुयायी समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत आहेत.
एकेकाळी मातंग समाजाला एकत्र येण्यासाठी असे कोणतेही ठिकाण आजपर्यंत उपलब्ध नव्हते. सामाजिक दृष्टीने त्याचा मोठा फटका समाजाला बसला. कारण जेव्हा एखादा समाज त्यांच्या महापुरुषांच्या स्मारक स्थळी अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येतो तेव्हाच समाजाला महापुरूषाच्या विचारांची व कार्याची प्रेरणा मिळत असते. एक आदर्श जीवन कसे जगावे, हे समजते. त्यामुळे अशा समाजामध्ये महापुरुषांचे विचार रुजतात. त्यामुळेच समाजाची विशिष्ट अशी जीवनशैली तयार होऊन समाज प्रगतीपथाकडे आगेकूच करतो.
जेव्हा समाज बांधव सामूहिक रीतीने स्मारक स्थळी एकत्र येतात तेव्हा त्या समाजामधील न्यूनगंडाची व असुरक्षिततेची भावना नष्ट होऊन समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. चैतन्य निर्माण होते आणि असा आत्मविश्वास, चैतन्य निर्माण झालेला समाजच संघर्षासाठी सिध्द होतो, इतिहास याला साक्षी आहे.
मातंग समाजाला अण्णा भाऊ साठे यांच्यामुळेच ऐंशीच्या दशकात एकत्र येण्यासाठी प्रथम आदर्श मिळाला, प्रेरणा मिळाली. कारण त्यापूर्वी मातंग समाज हा फक्त नातेवाईकांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी व ऊरुस, जत्रा या निमित्ताने एकत्र येत असे. धर्म व महापुरुषाची माहिती नसल्यामुळे तेव्हा समाज फक्त नातेवाईक एवढ्यापुरताच मर्यादित होता. म्हणून चळवळीत १९७० नंतर म्हणजे उशीराने मातंग समाज सामील झाल्यामुळे प्रगतीतही इतर समाजाच्या मानाने खूप मागे पडला. परंतु आता ही उणीव भरुन काढण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीने केलेल्या तीव्र आंदोलनामुळे मातंग समाजाला हक्काची 5 एकर जागा मिळालेली आहे. तसे पाहता 5 एकर जागा सुध्दा अपुरीच आहे. तरीही भविष्यात येथे लाखो लोक एकत्र आले तर मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांना याठिकाणीच वाचा फुटू शकते. लोकशाहीत डोकी मोजली जातात. तुमच्या ताकदी नूसार तुमची दखल घेतली जाते. कारण तुम्ही जरी सत्ता मिळवू शकत नसला तरी निवडणूकीच्या माध्यमातून सरकार घालवू शकता. म्हणून उरुस, जत्रेतील वैयक्तिक अभिलाषा असलेल्या धार्मिक भावनेने नव्हे तर तुमच्या महापुरुषांच्या आदर्श अशा विचारांच्या प्रेरणेने जेव्हा तुम्ही लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी एकत्र येता तेव्हाच तुम्ही ख-या अर्थाने जागृत झाला असा अर्थ प्रस्थापित व्यवस्था लावत असते आणि मगच तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी वर्ग तयार होतो. उदा.मराठा, पटेल, जाट आरक्षण हे घटनेतील तरतूदी नूसार शक्य नसले तरी लाखो जागृत लोकांच्या दबावापुढे सत्ताधारी वर्ग आरक्षण देण्यास तयार होतो. प्रसंगी घटना दुरुस्ती करुनही आरक्षण दिले जाऊ शकते परंतु अबकड विषयी आपली न्याय मागणी असताना देखील अज्ञानामुळे समाज संघटित नसल्यामुळे ही मागणी पूर्ण केली जात नाही. म्हणून आपण सर्वांना सातत्याने समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. स्टेजवरील आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना शिस्त लावणे ही आता सभेला उपस्थित राहणा-या, शिस्त पाळणा-या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे, समाजाचे कर्तव्य आहे. असे लोखंडे यांनी समाज माध्यमावरून बांधवांना सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























