पुणे 24 तास : मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात करण्यात आलेल्या खरेदी खतातून विश्वासाचा अजब नमुना दिसून आला आहे. कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी ३०० कोटींच्या या जमिनीच्या व्यवहारापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राईजेसकडून एकही कृपया न घेता थेट खरेदीखत केले आहे. ही तीनशे कोटींची रक्कम कशी व केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख या खरेदीखतात केलेला नाही, हे विशेष. सामान्यांच्या खरेदीखतावेळी मात्र, किती पैसे दिले, कसे देणार आहात, खरेदीखतापूर्वी साठेखत करूया, त्यानंतर पूर्ण रक्कम मिळाली की खरेदीखत करू, अशा नाना स्वरूपाच्या कार्यवाहीला विक्री करणारा तसेच वकील आणि दुय्यम निबंधक देखील आग्रह धरत असतो. या व्यवहारात मात्र असा कोणताही ‘अर्थपूर्ण’ आग्रह धरण्यात आलेला नाही.
सध्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या गैरव्यवहारामुळे गेले दोन दिवस राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. चौफेर टीका झाल्यानंतर अखेर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. पार्थ पवार यांनी नेमका काय व्यवहार केला, हे आपल्याला माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या व्यवहारात एकाही रुपयाची देवाणघेवाण झाली नसल्याचेही स्पष्ट केले.
कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांच्यात झालेल्या खरेदीखतात याचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनीची प्रत्यक्षात किंमत सुमारे १८०० कोटी रुपये सांगितली जात आहे. मात्र, खरेदीखत करताना या जमिनीचे मूल्य २९४ कोटी रुपये इतके दाखविण्यात आले. तर व्यवहार करताना ३०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे खरेदी खतावरून दिसून येत आहे.
कोणताही व्यवहार करताना खरेदीदार काही ठराविक रक्कम विक्री करणाऱ्याला देत असतो. उर्वरित रक्कम किती आणि केव्हा दिली जाईल, याचा उल्लेख साठेखतात केला जातो. संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर पुन्हा खरेदीखत केले जाते. हे करत असताना अशा व्यवहारांमध्ये बँकेकडून कर्ज घ्यावयाचे असल्यास रक्कम किती व कशा स्वरूपात दिली आहे, कधीपर्यंत दिली जाणार याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते. याबाबत बँका आग्रही असतात. तसेच वकीलही अशा स्वरूपाच्या उल्लेखाचा आग्रह धरतात. दस्ताचा मसुदा तपासण्यापूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनही याबाबत विचारणा केली जाते. त्यामुळे सामान्य नागरिक अशा स्वरूपाचा व्यवहार करताना सजग असल्याचे दिसून येते.
——–
मात्र, या तीनशे कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या व्यवहारात खरेदीदाराकडून एक रुपयाही देण्यात आला नाही. तरीदेखील कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी या व्यवहारात साठेखत न करता थेट खरेदीखत केले. त्यातही ही तीनशे कोटी रुपये रक्कम खरेदीदाराकडून मिळेल एवढेच एवढाच उल्लेख त्यात करण्यात आला. मात्र, ही रक्कम केव्हा मिळेल कशी मिळेल याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. अर्थात ‘शून्य’ रुपयांच्या ‘विश्वासावर’ हा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण करण्यात आला आणि त्याचे खरेदीखतही पूर्ण झाले. त्यामुळे या व्यवहारातून ‘विश्वासाचा’ अजब नमुना सामान्यांपुढे प्रस्तुत करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे व्यवहार झाल्यास विश्वासाचे अनेक पायंडे रचले जातील असे जाणकार वकिलांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























