– महायुतीने महापालिका निवडणूका एकत्रित लढवाव्यात
– रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील
– वाल्मिक कराडवर खूनाचा गुन्हा दाखल करावा

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
विधानसभा निवडणूकीत जनतेने महायुतीला भरभरून यश दिले. शिवसेनेचे ५७ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडून आणले. त्यामुळे मातोश्री वर आता खरी शिवसेना राहिलेली नाही. तर खरी शिवसेना आता ठाण्याच्या बाजूने असून, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.असे स्पष्ट मत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली.या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार देखील सांभाळता आले नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. परंतू मतदारांनी विरोधकांना डावलले. खोटे बोलून आरोप करून निवडणूका जिंकता येत नाहीत. केवळ टिका कऱणे आणि आरोप करणे हे जनतेला पसंत पडले नाही. लाडकी बहिण योजनेचाही महायुतीला फायदा झाला. आमचा पक्ष भाजपचा पहिल्यापासून मित्र पक्ष राहिला आहे. त्यामुळे दलित समाजाने देखील महायुतीला मतदान केले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आठवले म्हणाले की, महायुतीत कोणताच वाद नाही. मात्र पालकमंत्री पद आपल्या नेत्याला मिळावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंबंधीचा निर्णय घेतील. येणार्या महापालिका निवडणूकांसाठी पुणे शहरात आरपीआय ला १५ ते १६ जागा मिळाव्यात अशी आमची महायुतीकडे मागणी आहे. तसेच महायुतीने एकत्रित महापालिकेच्या निवडणूका लढवाव्यात. महापौर पद जर अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव झाल्यास, महापौर पद आरपीआयला मिळावे,अशी आमची मागणी आहे.
बीड आणि परभणी प्रकरणाबाबत रामदास आठवले म्हणाले की, दिवंगत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना न्याय मिळाला पाहिजे. देशमुखांच्या हत्येच्या अगोदर कराड आणि त्याच्या साथीदारांचे संभाषण झाले होते. त्यामुळे बीड प्रकऱणात वाल्मिक कराड वर खूनाचा गुन्हा दाखल करावा. परभणीतील घटनेबाबत पोलिसच जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित पोलिसांना बडतर्फ करावे.
भीमा कोरेगाव येथील स्मारकाबाबत रामदास आठवले म्हणाले की, स्मारकाच्या विकासाचे प्रकरण गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. स्मारकाच्या विकासाच्या आराखडयासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. स्मारकाचा विकास वेगाने व्हावा. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिणार आहे.
डॉ.सिद्धार्थ धेंडे स्वतःहून आले तर पक्षात पुन्हा घेण्यात येईल.
महायुतीच्या विरोधात डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी अशी भूमिका घ्यायला नको होती. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले. जर डॉ.सिद्धार्थ धेंडे स्वतःहून आले तर त्यांना पक्षात पुन्हा घेण्यात येईल. असेही केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























