रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम

मोहिनी मोहिते, संपादक
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन, त्यांचा संघर्ष, शाहिरीतून उभा केलेला सामाजिक क्रांतीचा लढा आणि समतेचा संदेश… हे सर्व शब्दांपेक्षा सुरांतून अधिक प्रभावीपणे हजारो नागरिकांपर्यंत पोहोचले. सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित सादर केलेल्या शाहिरी आणि गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. त्यांच्या प्रत्येक गीतातून अण्णाभाऊंचे कार्य, विचार आणि समाजासाठीचे योगदान जिवंत झाले आणि याच बहारदार सादरीकरणामुळे १०६ वा जयंती महोत्सव अविस्मरणीय ठरला.
रविवार (दि. २ ऑगस्ट) रोजी श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला प्रांगण, रामोशी गेट येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नगरसेवक विवेक यादव यांच्या वतीने करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी आपल्या लेखणी, साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली. तसेच नगरसेवक विवेक यादव यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
आयोजकांच्या वतीने विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात चंदन कांबळे यांनी सादर केलेल्या शाहिरी, पोवाडे आणि गीतांनी अण्णाभाऊ साठे यांचा संपूर्ण जीवनप्रवास जणू रसिकांसमोर उभा केला. त्यांच्या दमदार आवाजाला आणि प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. अनेकांनी हा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर उपस्थित हजारो नागरिकांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले. सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, माजी नगरसेवक बापू कांबळे, नगरसेविका मृणाल कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, माजी नगरसेवक संदीप लडकत, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे अध्यक्ष अनिल हातागळे, सचिव ॲड. महेश सकट, स्वीकृत नगरसेवक जयप्रकाश पुरोहित, रिपाइं शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, नगरसेवक देवेंद्र वडके,राजेंद्र काकडे ,सुधीर जानजोत, सोनू भाऊ निकाळजे, अविनाश मोरे, सुजित यादव, भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष सादिक लुकडे आदी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजन समिती संतोष यादव , नितीन भूरेवार , महेश यादव, अमित मते, रोहित ओझरकर , शशांक माने, संदीप धांडोरे, रणवीर अरगडे, कैलाश तातुस्कर , सागर परदेशी, अभिजीत कसबे ,योगेश नेटके, लोकेश अवचिते, कैलेश कदम सर्व पदाधिकारी मित्र परिवार, कार्यकर्ते व मंडळ पदाधिकारी यांचे श्रमदान लाभले
समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा जयंती महोत्सव पुण्यातील एक संस्मरणीय सामाजिक-सांस्कृतिक सोहळा ठरला.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह


























