सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते – कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ
पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक स्वास्थ्याला चालना देत त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी (१७ जुलै) ‘अभंग वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून आर के स्मृती बहुउद्देशीय संस्था पुणे, ऋषीआनंद वन – हडपसर, व सुकांता थाळी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात ओंकार लोहार आणि गायत्री कुंडेकर यांनी अभंग भजने तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिरसपूर्ण सादरीकरण करून उपस्थित बंद्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संस्थेचे संस्थापक आनंद साळुंखे, सचिव भाग्यश्री साळुंखे, विजयकुमार मर्लेचा, प्रमोद छाजेड आणि खास प्रमुख अतिथी म्हणुन राज्य विधिमंडळाचे ग्रंथ विभागाचे मुख्य अधिकारी बाबासाहेब वाघमारे उपस्थित होते.
आयुष्यात केलेल्या चुकांमुळे बंदिवानाचे जीवन वाट्याला आले असले तरी अभंगवाणी कार्यक्रमाच्या रूपाने साक्षात विठ्ठलाचा गजर तुरुंगाच्या भिंतीच्या आत घुमल्यामुळे पुढे कैद्याच्या आयुष्यात सकारात्मक घडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..
कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून आणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी अति. अधीक्षक पल्लवी पी कदम, उपअधीक्षक आर. ई गायकवाड, वरीष्ठ तुरुंगाधिकारी एस आर पाटील, शिक्षक एन आर शिंदे,शिक्षक जी. व्ही. तागड तसेच इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहीले.
मानवी मनाला स्पर्श करणारा उपक्रम
तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी वेळ असते, जेव्हा ती स्वतःच्या चुकांचा विचार करते. अशा वेळी उपदेशापेक्षा संस्कार, संगीत आणि अध्यात्म अधिक प्रभावी ठरतात. येरवडा कारागृहातील हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हता, तर बंदिवानांच्या मनात आशा, आत्मपरीक्षण आणि नव्या आयुष्याची प्रेरणा जागविण्याचा एक प्रयत्न होता. तुरुंगाच्या उंच भिंतींच्या आत घुमलेला विठ्ठल नामाचा गजर अनेकांसाठी कदाचित नव्या जीवनप्रवासाची सुरुवात ठरू शकतो. सर्व उपस्थित बंद्यांच्या एक मुखाने विठ्ठलाचा गजर केला जो मनाने विठ्ठला पर्यंत पोहोचला.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह

























