गांधी विचार साहित्य संमेलनाचे
७ मार्च रोजी खा. मनोजकुमार झा यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे ( पुणे 24 तास ब्युरो )
गांधी विचार साहित्य संमेलन पुण्यात आज पासून सुरु होत असून, तीन दिवसांच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४.०० वाजता राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते खासदार मनोजकुमार झा यांच्या हस्ते गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे स्वागताध्यक्ष असून, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे संयोजक आहेत. प्रारंभी सर्वधर्म प्रार्थना व उद्देशिकेचे वाचन होऊन संमेलनास सुरवात होईल.यामध्ये महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन धनश्री करणार आहेत.
याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, यासाठी कोथरूडच्या गांधी भवन प्रांगणात १३० x 65 फुट असा भव्य मंडप उभारण्यात आला असून, १५०० आसन क्षमता आहे. या सभागृहास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. २० व्यक्ती बसू शकतील असा भव्य व कलात्मक मंच उभारण्यात आला असून, त्यास जेष्ठ गांधीवादी विचारवंत ‘(कै) बाळासाहेब भारदे व्यासपीठ’ असे नाव देण्यात आले आहे. स्टेजवर भव्य बॅकड्रोप उभारण्यात आला असून आकर्षक प्रकाश योजना व ध्वनी योजनेची व्यवस्था करण्यात आली आहे.
गांधी भवन येथे प्रवेशद्वारापाशी भव्य आकर्षक कमान उभारण्यात आली आहे. येथे एकावेळी ४०० व्यक्ती जेवण करू शकतील असा भोजनाचा मंडप असून, ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पुस्तक व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शनात’ एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यातील २० स्टॉल्स मध्ये महात्मा गांधीवरील प्रकाशित ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री व्यवस्था असणार असून, १० स्टॉल्स मध्ये खादी, गांधीजींची स्मृतिचिन्हे, ग्रामोद्योग व स्वदेशी वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत.
भोपाळच्या शिळाचित्र कलाकार अनिता दुबे यांनी दगडातून साकारलेल्या गांधी जीवन दर्शनाच्या 50 शिल्पकृतीचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण असून, सोबत गांधी छायाचित्र प्रदर्शनही असणार आहे.
या संमेलनाच्या निमित्य गांधी भवन येथील वास्तूच्या टेरेसवरून सुमारे १० फुट व्यासाचा भव्य ‘हेलियम बलून’ सोडण्यात आला असून, सुमारे ६० ते ७० फुट उंच आकाशात डोलणार हा बलून आकर्षण बनला आहे. येथे सुमारे २०० चारचाकी व सुमारे ५०० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र सोयही करण्यात आली आहे. येथे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
सायंकाळी ८ वाजता ‘भारतीय संविधान का संगीतमय सफर’ हा संविधानिक मूल्यांचा उद्घोष करणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होईल. याची संहिता लक्ष्मीकांत देशमुख यांची असून, प्रदीप निफाडकर, धनंजय पवार आणि साथीदार हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
या संमेलनासाठी नोंदणी शुल्क १५० रुपये असून या शुल्कात भोजन व नाष्टा दिला जाणार आहे. या संमेलनास नागरिकांनी विशेषत: तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान डॉ. कुमार सप्तर्षी व स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























