पुणे (पुणे 24 तास ब्युरो)
नाना पेठ येथील डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रा. राजश्री भोसले, प्राचार्य डॉ. प्रवीण कांबळे, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, माजी प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. जयश्री कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली भागवत, निर्भय कन्या विभाग प्रमुख डॉ. अरुणा मुडावत, विद्यार्थिनी मंच विभाग प्रमुख डॉ. कोमल भोसले, प्रसिद्धी प्रमुख प्रा. रेखा मोरे,सहाय्यक परीक्षा विभाग व व्यक्तिमत्व विकास विभाग प्रमुख स्नेहा भोसले,यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत,जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे आणि खजिनदार सिद्धार्थ शेवाळे यांनी सहकार्य केले आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला सबलीकरण हा काळाची गरज –प्रमुख अतिथी प्रा.राजश्री भोसले यांनी आपल्या भाषणात स्त्रीशक्तीच्या महत्त्वावर भर दिला. त्या म्हणाल्या,”महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांच्या संघर्षाचा, यशाचा, हक्कांचा आणि सन्मानाचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली जिद्द आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. शिक्षण, विज्ञान, व्यवसाय, कला किंवा सामाजिक कार्य – सर्वच क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत.”
त्यांनी महिलादिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत १८५७ साली न्यूयॉर्क येथे महिलांनी समान हक्क आणि वेतनासाठी केलेल्या आंदोलनापासून १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृत मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रवासाचे विवेचन केले. त्या पुढे म्हणाल्या,”महिला सशक्तीकरण म्हणजे महिलांना समान संधी, शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि निर्णयस्वातंत्र्य मिळणे. मात्र, अजूनही समाजात लिंगभेद आणि अन्याय कायम आहे. म्हणूनच महिला सबलीकरण हा आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाचा विषय आहे.”
स्त्री ही एक माता,पत्नी आणि मुलगीच नव्हे तर सक्षम व्यक्ती – डॉ.जयश्री कांबळे,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. जयश्री कांबळे यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ एक नातेसंबंधांपुरती मर्यादित नाही, तर ती एक सक्षम व्यक्ती आहे. समाजातील प्रत्येकाने महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे.
“स्वतःवर विश्वास ठेवा” – डॉ. भारती सहस्रबुद्धे,माजी प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थिनींना संदेश दिला की,”शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करा, स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवा, स्वावलंबी बना आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ ही योजना केवळ घोषणा नसून समाजाची खरी गरज आहे.”
“एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवते” – स्नेहा भोसले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. स्नेहा भोसले म्हणाल्या,”जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नसून, महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि सशक्तीकरणासाठी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य केले पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कोमल भोसले यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.रूपाली भागवत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.अरुणा मुडावत यांनी मानले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























