पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने रविवारी (दि. ९) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय देण्याची मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना वैभवी म्हणाली, दादा, माझे वडील गेले आहेत, आम्ही न्याय मागतो आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललेय. ते जे करत आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होत चालले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे मी न्यायाची मागणी करते. आमच्या भागात अनेक गंभीर प्रकरणी घडली आहेत, त्याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वैभवी हिने केली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वैभवी देशमुख म्हणाली, आमची पहिल्यापासूनच एकच भूमिका आहे, ती म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. खंडणीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ती खंडणी नेमकी कोणाकडे जाते, हा सुद्धा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे. माझ्या वडिलांसंबंधी घटना घडलेली असताना अजूनही काही घटना घडत आहेत. वडिलांच्या खूनाचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत, त्यातून मृतदेह समोर असतानाही आरोपी कसा अमानुष छळ करत आहेत, हे दिसून येते. या मागे निश्चित कोणाचा तरी हात, मोठा पाठींबा आहे. आज तीन महिने झाले महाराष्ट्र न्यायासाठी आस लावून बसला असल्याचे वैभवी हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























