पुणे ः विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकवृंदांकडून ज्ञानदान अविरत सुरू असते. त्यातून “विद्यार्थी केवळ ऐकणारे नव्हे तर स्वतःच्या अनुभवातून शिकणारे झाले, तर शिक्षण खऱ्या अर्थाने समृद्ध होते,” असे मत जि.प. प्राथमिक शाळा पेठ (ता. हवेली) केंद्र सोरतापवाडीचे मुख्याध्यापक लक्ष्मण सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ केंद्र सोरतापवाडी (ता. हवेली) पुणे येथे शाळेच्या स्टेजवर ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन साहित्य प्रदर्शन व कृती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख आशालता कटके, पदवीधर शिक्षक : राजेंद्र कुंभारकर, शिक्षक : सचिन साकोळकर, वैशाली आठवले, आरिफा शेख, तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित कृती साहित्य, शब्दकोडी, शब्दडोंगर, पाढे तयार करणे, बहुपयोगी अध्ययन साहित्य- “एक शब्द – अनेक वाक्ये”, दशमान परिमाणे यावरील उपक्रम तसेच, मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी स्वतः साहित्य वापरून स्व-अध्ययन अशा उपक्रमात विद्यार्थी रममान झाले होते. तसेच, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या साहित्याच्या माध्यमातून गणित व भाषा विषयातील संकल्पना सहज समजून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानरचनावादाचा वापर करून मॅडमला पाढे तयार करून प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीला चालना देणारा व ज्ञाननिर्मितीचा आदर्श नमुना ठरला असून पालक व शिक्षकांकडूनही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले.
सूर्यवंशी म्हणाले की, ज्ञानरचनावादावर आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व स्व-अध्ययनाची सवय निर्माण होत आहे, ही समाधानची बाब आहे. शाळा अभ्यासपूर्ण व आनंददायी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थी-पालक दोघांचेही शैक्षणिक प्रबोधन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























