जैन समाजाच्या भावनांना न्याय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार : चंद्रकांतदादा पाटील
पुणे २४ तास:- ( संपादक) मोहिनी मोहिते
गेला महिनाभर सुरू असलेल्या पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या हॉस्टेल संदर्भातील व्यवहार रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांनी आज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिला. ‘हा मुद्दा जैन समाज आणि संबंधित विकसक यांच्यातील असून या प्रकरणात जैन समाजाच्या भावनांना न्याय दिला जाईल,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. विकसकाने व्यवहार रद्द करण्यासाठी केलेला अर्ज, त्यानंतर ट्रस्टने व्यवहारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाला दिलेली ग्वाही या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी सामाजिक सलोखा जपणारी भूमिका घेत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि विकसक यांच्या परस्परमान्यतेने व्यवहार पूर्णतः रद्द करण्याचे आदेश दिले. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या व्यवहारापोटी ट्रस्टला अदा केलेली रक्कम विकसकास परत देण्याचे स्पष्ट निर्देशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.
या विषयात पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि माझे मित्र मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले गेले. भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेक नतद्रष्टांसाठी असूयेचा विषय आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. निवडणूक जवळ आली की या प्रयत्नांना जोर येतो. मुरलीधर मोहोळ यांच्या बदनामीचा प्रयत्न हा या असूयेचाच भाग होता. या प्रकरणात आरोपांची राळ उठवणाऱ्यांच्या पूर्वेइतिहासावर नजर टाकली तर त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना सहज समजू शकेल.
या प्रकरणात विविध आरोप व टीका होत असतानाही जैन समाजासाठी अत्यंत शांत, संयमी आणि संतुलित भूमिका घेतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मी विशेष अभिनंदन करतो. या निर्णयामुळे जैन समाजाच्या मागणीला योग्य तो न्याय मिळाला असून, जैन मुनींचाही सन्मानपूर्वक आदर केला गेला आहे. या विषयी जैन समाजाने घेतलेल्या सामजंस्यपूर्वक भूमिकेबद्दल त्यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.
भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळणारा जनतेचा कौल हा प्रत्येक समाजघटकाचा विश्वास कमावण्यातून मिळालेला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी पक्ष, नेते आणि कार्यकर्ते सातत्याने घेत असतात. हा विश्वास पुन्हा एकदा देवेंद्रजींनी सार्थ ठरवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात विनाकारण सुरू असलेली चिखलफेक थांबवावी आणि पुण्यातले वातावरण आणखी गढूळ करू नये, अशी अपेक्षा मी यानिमित्ताने करतो.
—

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























