सकल जैन समाजाचा पितामह म्हणून ओळख असलेले दानशूर व्यक्तिमत्व
वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण
पुणे :- सकल जैन समाजाचा पितामह म्हणून ओळख असलेले दानशूर व्यक्तिमत्व असलेले, १४ जुलै १९३९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन्मलेल्या वालचंद देवचंद संचेती यांच्या जीवनाला आज ८७ वर्षे पूर्ण होत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १९५० साली शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या या तरुणाने कॅम्प एज्युकेशन सोसायटी’च्या राजा धनराज गिरजी हायस्कूलमधून शिक्षणाची सुरुवात केली, आणि पुढे त्याच संस्थेचे मानद सचिव म्हणून गेली ५५ वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. जेव्हा त्यांनी संस्थेची जबाबदारी घेतली तेव्हा तेथे ३८०० विद्यार्थी होते आणि आज त्यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे ती संख्या १५००० पर्यंत पोहोचली आहे. संस्थेला १४२ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभली असून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमात २५% विद्यार्थ्यांची फी समाजातून गोळा करून भरण्याची व्यवस्था केली तसेच ज्यांच्या घरी इंग्रजीचा पाया नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु केले. संस्थेचा १० वी चा निकाल गेली ५ वर्षे सलग १००% लागत असून याचे सर्व श्रेय त्यांच्या नेतृत्वाला जाते. काळाची गरज ओळखून त्यांनी बीसीए, बीबीए, एमबीए, आय एच एम सारखे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आणि ‘डॉ. सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ सुरु करून विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन १९८५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग आणि २०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांनी २०११ मध्ये १२००० विद्यार्थ्यांसाठी इलर्निंग ची सुविधा सुरु केली. व्यवसायाने ते फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील यशस्वी उद्योजक असून गेली ६१ वर्षे ‘पुणे मर्चंट्स चेंबर’ शी निगडित आहेत आणि अनेक वर्षे अध्यक्षपदही भूषविले आहे. चेंबरची भव्य इमारत उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून १९९२ मध्ये उपराष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते त्यांचा व्यापारी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार झाला. ‘ओसवाल बंधू समाज’ चे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य म्हणून ते दरवर्षी १ कोटी २५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जैन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देतात तसेच सर्व समाजातील सुमारे पाच हजार गरजू रुग्णांच्या बायपास सर्जरीसाठी मदत करून त्यांना नवजीवन दिले आहे. ‘द फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेड्स – महाराष्ट्र राज्य’ चे अध्यक्ष, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि महाराष्ट्र शासनाच्या एम्प्लॉयी कामगार बोर्ड चे प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. समाजभूषण पुरस्कार आणि लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित झालेले श्री. वालचंद संचेती वयाच्या ८८ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने समाजकार्यात सक्रिय आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की स्वतःसाठी जगलात तर आयुष्य संपते पण दुसऱ्यांसाठी जगलात तर आयुष्य अमर होते. सतत कार्य करण्याची वृत्ती, चारित्र्य संपन्नता, विनम्रता, उद्यमशीलता, समाजातील गरजू लोकांविषयी कळकळ, विद्यार्थ्यांविषयी तळमळ, शिक्षकांबददल आत्मीयता, प्रामाणिकपणा, निरलसपणे काम करण्याची धारणा, व्यावसाय आणि समाजसेवा यांची योग्य सांगड घालून आपली जीवनक्रमण करीत आहे. आणि म्हणूनच जीवनात सर्वस्पर्शी गुणांनी संपन्न असणा-या वालचंदजींचे व्यक्तीमत्व “बहुआयामी” वनलेले आहे. नुकताच संचेती यांचा शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जैन समाजातर्फे ” समाजरत्न” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे . यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनिल दाहोत्रे व त्यांच्या परिवाराकडून त्यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह

























